Friday, August 17, 2012

कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला ?



प्रख्यात विचारवंत प्रा.शेषराव मोरे यांचे "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला? " हे पुस्तक काल खरेदी केले आणि अधाशीपणे अर्धे अधिक रात्री वाचून काढले...जबरदस्त पुस्तक आहे....फाळणी का झाली, तिची अपरिहार्यता काय होती, म. गांधी आणि (तत्कालीन) कॉंग्रेस यांनी हा विषय कसा हाताळला याचे फारच मार्मिक विश्लेषण या पुस्तकात आहे. माझ्या वाचण्यात "फाळणी" या विषयावरची अनेक भाषांमधील अनेक पुस्तके आली, मात्र 'या सम हेच' असेच या पुस्तकाच्या बाबतीत म्हणावे लागेल.फाळणीचा एवढा वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष विचार करणे इतर लेखकांना जमलेले नाही....

अर्थात आता "निष्पक्ष आणि तटस्थ" हा विचारच हद्दपार झालेला असल्याने वेगवेगळ्या "इझ्म्स" वाल्यांनी आपापला इझम हाच कसा मोक्षाचा मार्ग आहे हे उच्च रवात सांगत राहणे एवढेच वैचारिक संचित आपल्याकडे उरले आहे. नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई, स.ह. देशपांडे आणि शेषराव मोरे हे माझ्या वाचनाचे चार वेद आहेत असे मी म्हणतो. या चौघांमध्ये समान सूत्र असे की त्यांचे विचार "आंधळा धर्मवाद" आणि "आंधळा धर्म निरपेक्षतावाद " या दोन्ही आचरट वादांपासून शेकडो मैल दूर आणि म्हणूनच तटस्थ आणि निष्पक्ष राहिले.....विशेषतः फाळणी हा विषय असा आहे की ज्याचे नाव निघताच धर्माभिमानी वगैरे लोक दु:खात बुडून जातात तर थोतांडी धर्मनिरपेक्षतावाले त्यात मुस्लिमांचा कसा काहीच दोष नव्हता हे उर बडवून सांगतात....हिंदुत्व वाद्याना आसिंधुसिंधूपर्यन्ता वगैरे असा "अखंड भारत" आजही निर्माण होऊ शकतो असे दिवास्वप्न दिसते तर सेक्युलर वाद्यांना लगेच एतद्देशीय मुस्लिमांचे काय होणार या चिंतेने निद्रानाशाचा विकार जडतो. मुळात "अखंड भारत" कधीच नव्हता, सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या भिन्न सहाशे संस्थानांचा सहभाग असलेला देश "अखंड" झाला तो काही प्रमाणात ब्रिटिशांनी त्याचे "राजकीय" एकीकरण केल्यामुळेच हे हिंदुत्ववादी समजून घेत नाहीत आणि फाळणी केली म्हणून गांधीजींना दोषी धरतात दुसऱ्या बाजूला ढोंगी धर्म निरपेक्षतेला कवटाळून बसणारे फाळणीला केवळ भावनेचा विषय मानून मुस्लिमांच्या संतुष्टीकरणांत स्वतःच्या विचारांचे सौख्य सामावले आहे असे मानतात ! या दोन्ही वैचारिक भोंगळतेला छेद देत हे पुस्तक फाळणी बाबत एक नवाच दृष्टीकोन आपल्याला देऊन जाते, ते ही सज्जड पुरावा आपल्यासमोर ठेवत !

या पुस्तकाचे नाव "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी फाळणी का स्वीकारली" असे न ठेवता "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला?" असे ठेवले आहे...यावरून बराच बोध होतो... शेषराव मोरे यांनी अतिशय परिश्रम पूर्वक लिहिलेले हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे मी आग्रहाने सांगेन... खास "कुरुन्द्करी" परंपरेतील हे पुस्तक फाळणीच्या विषयातील एक महत्वाचे पुस्तक म्हणून तटस्थ विचारांच्या विश्वात लोकप्रिय होईल यात शंका नाही.....

1 comment:

  1. पुस्तकाबद्दल बरेच वाचून आहे.
    त्यामुळे ह्या लेखामुळे आता तर हे पुस्तक वाचण्याची प्रबळ इच्छा उत्पन्न झाली आहे.

    ReplyDelete