Tuesday, September 25, 2012

खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....


खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....

महाराष्ट्राचे महान त्यागमूर्ती अजितदादा पवार यांच्या राजीनामा-नाट्याचा पहिला अंक जोरदार रंगला आहे. काल संध्याकाळी अजितदादांनी “नाट्यमयरित्या” राजीनामा दिला तेंव्हा तेथे राष्ट्रवादीचे नाट्यमहर्षी, समस्त-पवार-कुटुंब-भक्त जितेंद्र आव्हाड उपस्थित होते; म्हणजे नाट्यमयता अधिकच गहिरी झाली असणार यात शंका नाही. माध्यमांमधून एक प्रकारे अजितदादा हे कसे त्यागमूर्ती आहेत हे रंगवून सांगितले जाऊ लागले. या सगळ्या गदारोळात दादा हे कोण्या उदात्त कारणाने नाही, तर फार मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देत आहेत याचे भान फार थोड्या लोकांनी ठेवले होते. प्रश्न केवळ काही हजार कोटींच्या घोटाळ्याचा नसून कंत्राटदार-हितार्थ धरणांचा बांधकामाच्या दर्जात हीनता आणल्याने ही धरणे फुटल्यास लोकांची सुरक्षितताच धोक्यात येते एवढे हे गंभीर प्रकार आहे (कंत्राटदार हिताय- राजकारणी सुखाय!). तथापि अजितदादा म्हणजे जणू काही दुसरे लाल बहादूर शास्त्री असेच जितेंद्र आव्हाड यांचे बोलणे ऐकणाराचा समज व्हावा! दोन-तीन दिवसात हे राजीनामा नाट्य संपेल तेव्हा अजितदादा हे लाल-बहादूर की सौदा-बहाद्दर हे महाराष्ट्राला कळेलच. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता, चारित्र्य, साधनशुचिता हे शब्दच विरुद्धअर्थी असल्याने जनतेची दोन दिवस करमणूक एवढाच या घटनेचा अर्थ आज तरी दिसतो आहे.

एखादा महिनाच झाला असेल, काका केंद्र सरकारवर रुसले होते आणि त्यांच्यासह हवाई घोटाळा फेम प्रफुल्ल पटेल यांनी कार्यालयात जाणे सोडले होते. (अर्थात राजीनामा दिला नव्हता कारण दिल्लीच्या धूर्तांनी तो चपळाईने स्वीकारला असता आणि काकांची सत्ता गेली असती तर महाराष्ट्रातील पुतणे आणि तमाम मानस पुतणे यांच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालायला कोण राहिले असते? त्यामुळे काकांनी ‘किमान’ त्यागाचा मार्ग अवलंबिला !!). काकांच्या केंद्राकडे नेमक्या मागण्या काय होत्या? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही...अगदी जितेंद्र आव्हाड देखील त्या मागण्या सांगू शकणार नाहीत...कारण?....त्या मागण्या चार चौघात सांगण्या सारख्या नव्हत्याच....! काका रुसले, समन्वय समिती स्थापन झाली,  काका हसले, समितीचे पुढे काय झाले माहित नाही मात्र लवकरच लाचार राज्य सरकार लवासाच्या हिताचे निर्णय घेऊ लागले...जमिनी नियमित करण्याची भाषा होऊ लागली...पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांवर बोलेणासेच झाले...काकांच्या त्यागापुढे सगळ्यांनीच गुढगे टेकले...

राष्ट्रवादीला सत्तेची अफाट मस्ती चढली आहे आणि त्यात अनेक घोटाळ्यांमधून कमावलेला अमाप पैसा आणि जागोजागी पोसलेले टगे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यातून महाराष्ट्रातील भ्रष्ट, कणाहीन कॉंग्रेस नेतृत्व “घालीन लोटांगण, वंदीन चरण” एवढ्याच लायकीचे असल्याने ‘दोनो उंगलिया घी में और मुंह शक्कर में’ अशी राष्ट्रवादीची चंगळ चालली आहे. हे सर्व कोठे थांबणार तेच कळत नाही.

आता पुढे काय होणार? पुतणे रुसले-पुतणे हसले होऊन राजीनामा मागे घेतला जाणार? लाचारांची फौजही पुतण्यांच्या पाठोपाठ आपले राजीनामे मागे घेणार? कॉंग्रेस पुन्हा लोटांगण घालणार? घोटाळ्यांच्या चौकशीचे काय होणार? असे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत....एक अजून महत्वाचा प्रश्नही आहे...लाख मोलाचा...विजय पांढरे यांचं काय होणार? त्यांना मानसिक रुग्ण ठरवून, नोकरीतून काढून टाकून हे राक्षस वर विजयी हास्य करणार का?  किमानपक्षी काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत शिंदे ज्या थाटात बोलत होते त्यावरून तरी अशी शंका बळकटच होते..असं खरंच घडलं तर......?

तर....तर आपण आपल्यातील शिवराय जागे करायचे....विजय पांढरे यांच्यामागे महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभं रहायचं...त्यांना हात लावाल तर याद राखा असं सत्तेतल्या राक्षसांनां ठणकावून सांगायचं...आत्ताच तयारीला लागा...आपापल्या भागातील चळवळीचे कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांना तयार रहायला सांगा...विजय पांढरे यांना सरकारने धक्का जरी लावला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेच्या, अहिंसेच्या मार्गानं निदर्शनं, मोर्चे, धरणे, सत्याग्रह करून आपण सरकारला वठणीवर आणायच्या निर्धाराने रस्त्यावर उतरू...शासनात राहून भ्रष्टाचार विरोधात रणशिंग फुंकणारे खोब्रागडे यांच्या सारखे तलाठी, विजय पांढरे यांच्यासारखे अभियंते यांना पाठबळ देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे...शासनातील सगळ्या खोब्रागडे-पांढरे यांनी निर्भीडपणे घोटाळे बाहेर काढावेत, जनता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, जनतेची तशी मनोभूमिका तयार करू.... अजितदादा किती महान आहेत, ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले नाही तर महाराष्ट्राचं कसं नुकसान होईल, महाराष्ट्राचा गाडा पवारांच्या शिवाय कसा चालूच शकणार नाही, या प्रकारचे आभास, संभ्रम लाचारांच्या फौजेकडून निर्माण केले जातील...त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका...तत्ववेत्ता कार्लाईलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण ठेवा.... “खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे”.... सूर्यास्त होऊ देणं आपल्याला परवडणार नाही !!

***