Friday, July 30, 2010

स.ह. देशपांडे

प्रसिद्ध विचारवंत स.ह.देशपांडे यांनी ८५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. वैचारिक मराठी लेखनाच्या क्षेत्रात स.ह.यांनी स्वतःचा मोठा दबदबा निर्माण केला. स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले स.ह. संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांवरही टीकास्त्र सोडण्यास कचरत नसत. बुद्धीप्रामाण्य की संस्थागत निष्ठा असा प्रश्न समोर आला की ते अत्यंत निर्भीडपणे बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेला अग्रक्रम देत आणि त्यापायी निष्ठावान लोकांचा विरोध झेलण्याची त्यांची तयारी असे. कुठ्ल्याही इझमशी अनावश्यक निष्ठा न बाळगता राष्ट्रवादाला प्राधान्य देऊन स्वतंत्र बुद्धीने समीक्षा करणारे जे फारच थोडे लेखक झाले त्यात स.ह. देशपांडे यांचे फार वरचे स्थान आहे. त्यांची तुलना या बाबतीत कदाचित हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर या समकालीन लेखकांशीच होऊ शकेल.

"सावरकर ते भा.ज.प.: हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख" या त्यांच्या पुस्तकाने त्यांच्या एकूण साहित्याची ओळख झाली आणि त्यांच्या चिकित्सक वृत्तीने डोळे दिपून गेले. एवढी परखड आणि चिकित्सक समीक्षा एरवी फक्त कुरुन्दकरांच्याच साहित्यातून भेटीस यायची. (विशेष म्हणजे देशपांडेंनी या पुस्तकात कुरुंदकर, शहा आणि हमीद दलवाई यांच्या समाजवादी विचारांची परखड समीक्षा केली आहे)  धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव याविषयी इतके शास्त्रशुद्ध विवेचन इतरत्र आढळून येत नाही.  भारत धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे नेमके काय यावर विश्लेषण करतांना स.हंनि असे म्हटले की "भारतीय राज्य घटनेची अपेक्षा अशी आहे की राज्य (State) धर्मनिरपेक्ष असावे" समाज धर्मनिरपेक्ष असावा असा भारतीय राज्यघटनेचा आशय नाही. याचा खुलासा करतांना त्यांनी असे स्पष्टीकरण दिले की धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य चालवतांना धर्माधारीत विचार न करता सर्व धर्मांच्या लोकांनी एका लोकशाही व्यवस्थेला मान्यता देणे. अर्थात राज्य देशाने स्वीकारलेल्या घटनेनुसार (constitution) चालविणे, गीता, बायबल, कुरण या धर्मग्रंथांना अनुसरून नाही.

कोणाला पचनी पडो अथवा न पडो पण ही वस्तुस्थिती आहे. समाज धर्मनिरपेक्ष असावा असे घटनाकार बाबासाहेबांना वाटले असते तर त्यांनी हिंदू धर्म त्यागतांना पुन्हा एका दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला नसता. "मी आजपासून हिंदू धर्म सोडून दिला असून आता मी कुठल्याही धर्माचा नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष आहे"  अशी भूमिका त्यांना घेता आली असती मात्र समाज कधीही धर्मनिरपेक्ष होत नसतो हे आंबेडकरांना ज्ञात होते. हिंदुत्ववादी आणि समाजवादी या दोघांच्याही डोळ्यात अंजन घालणारी अशी ही शास्त्रीय भूमिका आहे.

वयोमानाप्रमाणे त्यांचे जाणे नैसर्गिकच असले तरी समतोल विचार करू शकणाऱ्या माणसांची महाराष्ट्रात जी दिवसेंदिवस वानवा होत चालली आहे त्यात स ह देशपांडे यांचे जाणे पोकळी वाढविणारे वाटले.

2 comments:

  1. प्रिय श्री विश्वंभर,
    लेख चांगला झाला आहे.विचार प्रवर्तक साहित्याची,आत्म परीक्षणाची,
    मूलभूत विचारांची, गरज समाजाला वाटतेय का अशी शंका येण्यासारखे
    मनगटशाहीचे वातावरण आपण बघतो आहोत.स.ह.माझ्या वैयक्तिक परिचयाचे होते.
    - जयंत.

    ReplyDelete
  2. Dr. Vishwambhar Choudhary,
    Congratulation and thank you for giving us opportunity to read your blogs. For Passive readers like me your blog will be a RnD and we can only read the conclusion of vast readings. Keep it up.

    ReplyDelete