Tuesday, December 25, 2012

अटल बिहारी वाजपेयी.......


भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात एकमेव पूर्ण काळ चाललेले बिगर कॉंग्रेस सरकार अटलजींनी चालविले. मला अटलजी जास्त भावले ते नव्वदीच्या दशकातले किंवा त्या आधीचे...तरुण, तडफदार अटलजींचे पहिले भाषण मी वयाच्या चौदाव्या वर्षी (१९८५, मला नीट आठवत असेल तर) औरंगाबाद येथे ऐकले. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि तत्कालीन (चांगल्या!) कॉंग्रेस मधील कार्यकर्ते मात्र त्यांना वाजपेयींचे व्यक्तिमत्व आणि भाषण फार आवडे, त्यामुळे फार लहानपणापासूनच मी अटलजीं बद्दल ऐकून होतो. संध्याकाळी ७ वाजताची सभा होती, धोती आणि नेहरू सदरा (किंवा लखनवी झब्बा असावा) अशा अस्सल भारतीय वेशात अटलजी स्टेजवर आले...मेरे भाईयो और बहनो...धीरगंभीर खर्जात भाषणाची सुरुवात आणि मग पुढचा दीड तास कसा गेला कळलंच नाही....माझ्यासारख्या नववीतल्या मुलापासून सभेतल्या सर्वात विद्वान माणसापर्यंत सर्वजण अक्षरश: स्तब्ध होऊन भाषण ऐकत होते....हा प्रसंग मनात आजही ताजा आहे.   

अटलजींची अनेक भाषणे मी पुढल्या काळात ऐकली. ते मला भाषणातले पं. भीमसेन जोशीच वाटले.. पंडितजींची मैफिल जसे पडल्याचे ऐकिवात नाही तसेच अटलजींचे भाषण पडल्याचे ऐकिवात नाही! दैवदत्त मधुर पण गंभीर आवाज, भारदस्त शब्द-योजना, भाषणात एकाच पट्टीतील खालच्या ‘सा’ पासून वरच्या षड्जा पर्यंत लीलया आणि समयोचित फिरणारा गळा, एखाद्या गवयालाही साधणार नाही असा खर्ज, चेहऱ्यावर अत्यंत समर्पक हावभाव अन् अतिशय परिणामकारक तरीही पूर्णत: सहजभाव असलेले हातवारे, वाक्याची लय वाढली की होणारी डोळ्यांची उघडझाप आणि वाक्याच्या शेवटी डोळे मिटून गाठली जाणारी सम, एखादा ख्याल चालला आहे असे वाटावे अशी लय, विलम्बितातून द्रुत मध्ये गेले तरी मात्रांचा मेळ समेवर आले की मोजून घ्यावा....विराम (पॉज) घेण्याची पद्धत अशी की कदाचित आणखी एखाद्या मागच्या किंवा पुढच्या शब्दावर हा विराम चाललाच नसता, तो इथेच हवा अशी श्रोत्याची खात्री व्हावी..आशय आणि अभिव्यक्ती दोन्हींनी संपन्न असलेलं असं भाषण जगातील फारच थोडे वक्ते करू शकतात...गांभीर्य, संकीर्णता, प्रसंगावधान, विनोद, मिष्कीलपणा, खोडकरपणा, कठोराघात वज्राघात, वाणी माधुर्य अशी उत्तम वक्त्याला लागणारी सर्व शस्त्रे अटलजींच्या भात्यात स्वत; होऊन हजर असत...वक्ता दशसहस्त्रेषु, नव्हे, दश कोटीषु म्हणजे अटलजी.......

भाषणात बोचरी टीका असेल पण ‘वार’ करणं अजिबात नाही. सुसंस्कृतता आणि शालीनता यांनी ओतप्रोत भरलेलं अन्य भाषण करणं सोपं आहे पण “राजकीय” भाषण करणं अवघड, पण ते त्यांना लीलया साधत आलं. सभ्यतम भाषेत कठोरतम टीका कशी करायची याचा वस्तुपाठ म्हणजे अटलजी..राजकीय भाषणातही अलंकारिक शब्द वापरता येतात, विद्वत्ता देखील सरळ सोप्या पण परिणामकारक शब्दात व्यक्त होऊ शकते, या दोन्ही गोष्टी त्यांच्या भाषणात दिसत. आधी बोलणारा वक्ता कोणीही असो, त्याच्या भाषणाचा प्रभाव अटलजींचे भाषण सुरु झाले की २-३ मिनिटात संपलाच म्हणून समजावे. एखादा हुकमी घोडेस्वार ज्याप्रमाणे लगाम हातात घेताच घोड्यावर लगेच नियंत्रण करून घोडा अक्षरश: आपल्या ताब्यात ठेवतो, तसे अटलजी सभा आपल्या ताब्यात ठेवत.
संसदेत विरोधी पक्षातील अटलजी म्हणजे तुकारामांनी म्हटलेले “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे” याची मूर्तीमंत प्रचीती!! मी संसदेच्या ग्यालरीतून त्यांची ४-५ भाषणं ऐकली आहेत. मला आठवतं तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अनेक खाती स्वत:कडे ठेवली होती. त्यावर संसदेत बोलतांना अटलजी म्हणाले “ देश को रक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री रक्षा मंत्री है, देश को शिक्षा मंत्री नही है, प्रधानमंत्री शिक्षा मंत्री है” यातलं रक्षा-शिक्षा यमक अत्यंत सहजतेने जुळवून आणावं ते त्यांनीच, इतरांना संसदेत असं काव्य स्वरुपात वास्तव मांडण असाध्य ठरावं, मात्र अटलजी ते सहज साध्य करत.

संसदेत तेव्हा रामायण या लोकप्रिय मालिकेतील दोन कलाकार दीपिका (सीता) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) निवडून आले होते. एका विषयावर (मला वाटते अयोध्येतील राम मंदीर) बोलताना अटलजी रंगात आले होते आणि समोरून कॉंग्रेस सदस्य मात्र त्यांना सतत डिवचत होते. कॉंग्रेस सदस्य म्हणत “सीता आपके बाजु मे बैठी है, और रावण भी आपकेही बाजू मे बैठे है” अटलजींनी ते ३-४ वेळा ऐकलं, मग अचानक त्यांचा तो प्रसिद्ध पॉज घेऊन म्हणाले “ हां हां मुझे मालूम है सीता मेरे बाजुमे बैठी है, रावण भी मेरे बाजुमे बैठे है, लेकिन वानर सेना मे इतना शोर क्यों हो रहा है भाई?” आणि संपूर्ण सभागृह अर्थातच हास्यकल्लोळात बुडालं...हजरजबाबीपणा आणि प्रसंगावधान असावे तर असे!

मध्यान्हीचा सूर्य कधीतरी पश्चिमेकडे प्रवास करणारच मात्र त्याची प्रभा आकाशाला निश्तिच व्यापून राहते तसे अटलजी आता राजकारणातील निवृत्ती भोगत असले तरी त्यांची प्रभा मात्र भारतीय राजकारण-समाजकारणाला व्यापून राहिली आहे आणि शरीराने थकलेले का असेना, आपण ज्या जगात आहोत त्याच जगात अटलजी आहेत ही भावना देखील मनाला मोठा दिलासा देणांरी आहे. ईश्वर त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो.

***

Tuesday, September 25, 2012

खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....


खुज्या माणसांच्या लांबलेल्या सावल्या....

महाराष्ट्राचे महान त्यागमूर्ती अजितदादा पवार यांच्या राजीनामा-नाट्याचा पहिला अंक जोरदार रंगला आहे. काल संध्याकाळी अजितदादांनी “नाट्यमयरित्या” राजीनामा दिला तेंव्हा तेथे राष्ट्रवादीचे नाट्यमहर्षी, समस्त-पवार-कुटुंब-भक्त जितेंद्र आव्हाड उपस्थित होते; म्हणजे नाट्यमयता अधिकच गहिरी झाली असणार यात शंका नाही. माध्यमांमधून एक प्रकारे अजितदादा हे कसे त्यागमूर्ती आहेत हे रंगवून सांगितले जाऊ लागले. या सगळ्या गदारोळात दादा हे कोण्या उदात्त कारणाने नाही, तर फार मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देत आहेत याचे भान फार थोड्या लोकांनी ठेवले होते. प्रश्न केवळ काही हजार कोटींच्या घोटाळ्याचा नसून कंत्राटदार-हितार्थ धरणांचा बांधकामाच्या दर्जात हीनता आणल्याने ही धरणे फुटल्यास लोकांची सुरक्षितताच धोक्यात येते एवढे हे गंभीर प्रकार आहे (कंत्राटदार हिताय- राजकारणी सुखाय!). तथापि अजितदादा म्हणजे जणू काही दुसरे लाल बहादूर शास्त्री असेच जितेंद्र आव्हाड यांचे बोलणे ऐकणाराचा समज व्हावा! दोन-तीन दिवसात हे राजीनामा नाट्य संपेल तेव्हा अजितदादा हे लाल-बहादूर की सौदा-बहाद्दर हे महाराष्ट्राला कळेलच. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नैतिकता, चारित्र्य, साधनशुचिता हे शब्दच विरुद्धअर्थी असल्याने जनतेची दोन दिवस करमणूक एवढाच या घटनेचा अर्थ आज तरी दिसतो आहे.

एखादा महिनाच झाला असेल, काका केंद्र सरकारवर रुसले होते आणि त्यांच्यासह हवाई घोटाळा फेम प्रफुल्ल पटेल यांनी कार्यालयात जाणे सोडले होते. (अर्थात राजीनामा दिला नव्हता कारण दिल्लीच्या धूर्तांनी तो चपळाईने स्वीकारला असता आणि काकांची सत्ता गेली असती तर महाराष्ट्रातील पुतणे आणि तमाम मानस पुतणे यांच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालायला कोण राहिले असते? त्यामुळे काकांनी ‘किमान’ त्यागाचा मार्ग अवलंबिला !!). काकांच्या केंद्राकडे नेमक्या मागण्या काय होत्या? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही...अगदी जितेंद्र आव्हाड देखील त्या मागण्या सांगू शकणार नाहीत...कारण?....त्या मागण्या चार चौघात सांगण्या सारख्या नव्हत्याच....! काका रुसले, समन्वय समिती स्थापन झाली,  काका हसले, समितीचे पुढे काय झाले माहित नाही मात्र लवकरच लाचार राज्य सरकार लवासाच्या हिताचे निर्णय घेऊ लागले...जमिनी नियमित करण्याची भाषा होऊ लागली...पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांवर बोलेणासेच झाले...काकांच्या त्यागापुढे सगळ्यांनीच गुढगे टेकले...

राष्ट्रवादीला सत्तेची अफाट मस्ती चढली आहे आणि त्यात अनेक घोटाळ्यांमधून कमावलेला अमाप पैसा आणि जागोजागी पोसलेले टगे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यातून महाराष्ट्रातील भ्रष्ट, कणाहीन कॉंग्रेस नेतृत्व “घालीन लोटांगण, वंदीन चरण” एवढ्याच लायकीचे असल्याने ‘दोनो उंगलिया घी में और मुंह शक्कर में’ अशी राष्ट्रवादीची चंगळ चालली आहे. हे सर्व कोठे थांबणार तेच कळत नाही.

आता पुढे काय होणार? पुतणे रुसले-पुतणे हसले होऊन राजीनामा मागे घेतला जाणार? लाचारांची फौजही पुतण्यांच्या पाठोपाठ आपले राजीनामे मागे घेणार? कॉंग्रेस पुन्हा लोटांगण घालणार? घोटाळ्यांच्या चौकशीचे काय होणार? असे सगळे प्रश्न आपल्यासमोर आहेत....एक अजून महत्वाचा प्रश्नही आहे...लाख मोलाचा...विजय पांढरे यांचं काय होणार? त्यांना मानसिक रुग्ण ठरवून, नोकरीतून काढून टाकून हे राक्षस वर विजयी हास्य करणार का?  किमानपक्षी काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत शिंदे ज्या थाटात बोलत होते त्यावरून तरी अशी शंका बळकटच होते..असं खरंच घडलं तर......?

तर....तर आपण आपल्यातील शिवराय जागे करायचे....विजय पांढरे यांच्यामागे महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभं रहायचं...त्यांना हात लावाल तर याद राखा असं सत्तेतल्या राक्षसांनां ठणकावून सांगायचं...आत्ताच तयारीला लागा...आपापल्या भागातील चळवळीचे कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांना तयार रहायला सांगा...विजय पांढरे यांना सरकारने धक्का जरी लावला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेच्या, अहिंसेच्या मार्गानं निदर्शनं, मोर्चे, धरणे, सत्याग्रह करून आपण सरकारला वठणीवर आणायच्या निर्धाराने रस्त्यावर उतरू...शासनात राहून भ्रष्टाचार विरोधात रणशिंग फुंकणारे खोब्रागडे यांच्या सारखे तलाठी, विजय पांढरे यांच्यासारखे अभियंते यांना पाठबळ देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे...शासनातील सगळ्या खोब्रागडे-पांढरे यांनी निर्भीडपणे घोटाळे बाहेर काढावेत, जनता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, जनतेची तशी मनोभूमिका तयार करू.... अजितदादा किती महान आहेत, ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले नाही तर महाराष्ट्राचं कसं नुकसान होईल, महाराष्ट्राचा गाडा पवारांच्या शिवाय कसा चालूच शकणार नाही, या प्रकारचे आभास, संभ्रम लाचारांच्या फौजेकडून निर्माण केले जातील...त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका...तत्ववेत्ता कार्लाईलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण ठेवा.... “खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या व्हायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असे समजावे”.... सूर्यास्त होऊ देणं आपल्याला परवडणार नाही !!

***

Friday, August 17, 2012

कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला ?



प्रख्यात विचारवंत प्रा.शेषराव मोरे यांचे "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला? " हे पुस्तक काल खरेदी केले आणि अधाशीपणे अर्धे अधिक रात्री वाचून काढले...जबरदस्त पुस्तक आहे....फाळणी का झाली, तिची अपरिहार्यता काय होती, म. गांधी आणि (तत्कालीन) कॉंग्रेस यांनी हा विषय कसा हाताळला याचे फारच मार्मिक विश्लेषण या पुस्तकात आहे. माझ्या वाचण्यात "फाळणी" या विषयावरची अनेक भाषांमधील अनेक पुस्तके आली, मात्र 'या सम हेच' असेच या पुस्तकाच्या बाबतीत म्हणावे लागेल.फाळणीचा एवढा वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष विचार करणे इतर लेखकांना जमलेले नाही....

अर्थात आता "निष्पक्ष आणि तटस्थ" हा विचारच हद्दपार झालेला असल्याने वेगवेगळ्या "इझ्म्स" वाल्यांनी आपापला इझम हाच कसा मोक्षाचा मार्ग आहे हे उच्च रवात सांगत राहणे एवढेच वैचारिक संचित आपल्याकडे उरले आहे. नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई, स.ह. देशपांडे आणि शेषराव मोरे हे माझ्या वाचनाचे चार वेद आहेत असे मी म्हणतो. या चौघांमध्ये समान सूत्र असे की त्यांचे विचार "आंधळा धर्मवाद" आणि "आंधळा धर्म निरपेक्षतावाद " या दोन्ही आचरट वादांपासून शेकडो मैल दूर आणि म्हणूनच तटस्थ आणि निष्पक्ष राहिले.....विशेषतः फाळणी हा विषय असा आहे की ज्याचे नाव निघताच धर्माभिमानी वगैरे लोक दु:खात बुडून जातात तर थोतांडी धर्मनिरपेक्षतावाले त्यात मुस्लिमांचा कसा काहीच दोष नव्हता हे उर बडवून सांगतात....हिंदुत्व वाद्याना आसिंधुसिंधूपर्यन्ता वगैरे असा "अखंड भारत" आजही निर्माण होऊ शकतो असे दिवास्वप्न दिसते तर सेक्युलर वाद्यांना लगेच एतद्देशीय मुस्लिमांचे काय होणार या चिंतेने निद्रानाशाचा विकार जडतो. मुळात "अखंड भारत" कधीच नव्हता, सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या भिन्न सहाशे संस्थानांचा सहभाग असलेला देश "अखंड" झाला तो काही प्रमाणात ब्रिटिशांनी त्याचे "राजकीय" एकीकरण केल्यामुळेच हे हिंदुत्ववादी समजून घेत नाहीत आणि फाळणी केली म्हणून गांधीजींना दोषी धरतात दुसऱ्या बाजूला ढोंगी धर्म निरपेक्षतेला कवटाळून बसणारे फाळणीला केवळ भावनेचा विषय मानून मुस्लिमांच्या संतुष्टीकरणांत स्वतःच्या विचारांचे सौख्य सामावले आहे असे मानतात ! या दोन्ही वैचारिक भोंगळतेला छेद देत हे पुस्तक फाळणी बाबत एक नवाच दृष्टीकोन आपल्याला देऊन जाते, ते ही सज्जड पुरावा आपल्यासमोर ठेवत !

या पुस्तकाचे नाव "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी फाळणी का स्वीकारली" असे न ठेवता "कॉंग्रेसने आणि म. गांधींनी अखंड भारत का नाकारला?" असे ठेवले आहे...यावरून बराच बोध होतो... शेषराव मोरे यांनी अतिशय परिश्रम पूर्वक लिहिलेले हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे मी आग्रहाने सांगेन... खास "कुरुन्द्करी" परंपरेतील हे पुस्तक फाळणीच्या विषयातील एक महत्वाचे पुस्तक म्हणून तटस्थ विचारांच्या विश्वात लोकप्रिय होईल यात शंका नाही.....

Tuesday, August 7, 2012

“टीम”ला शुभेच्छा ! आंदोलन मात्र सुरु रहावे...


आदरणीय अण्णांनी केलेले ‘टीम’चे विसर्जन, राजकीय पक्ष स्थापन करण्याची “टीम”ची उतावीळ घोषणा आणि “आता आंदोलनाने काही फरक पडणार नाही” अशी हाराकीरीची टीमने घेतलेली भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ३-४ दिवसांपासून अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांचे आलेले फोन, इमेल अथवा फेसबुक निरोप, माध्यमांकडून सतत होणारी विचारणा, पुढे काय ? असा चळवळीतील कार्यकर्त्यांना पडलेला स्वाभाविक प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर मी या ब्लॉगद्वारे भूमिका मांडत आहे. गेले २ दिवस मी आजारी असून घश्याच्या Infection मुळे बोलू शकत नाही, त्यामुळे हा ब्लॉग लिहीत आहे.

.      'टीम'ने पक्ष स्थापनेचा घेतलेला निर्णय :

राजकारणात चांगल्या लोकांनी आले पाहिजे आणि वेळ पडली तर राजकीय भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका मला मान्य आहे; मात्र कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी ही भूमिका घ्यावी याचे काही ताळतंत्र टीमने बाळगणे गरजेचे होते.

पहिला मुद्दा असा की आंदोलनाचा उपयोग होत नाही म्हणून राजकीय पक्ष काढला पाहिजे हा अत्यंत उथळ युक्तिवाद आहे. ६५ वर्षात राजकीय व्यवस्थेने लोकांसमोर जे प्रश्न उभे केले त्याची थोडीफार उत्तरे चळवळी/आंदोलने यांनीच समाजाला दिली आहेत. स्वत: अण्णांनी आजवर महाराष्ट्रात जी आंदोलने केली ती सर्व यशस्वी झाली आहेत हे “टीम” मधील विद्वानांनी लक्षात घ्यायला हवे होते. अण्णांची आंदोलने यशस्वी झाली नसती तर बदलीच्या कायद्यापासून माहितीच्या कायद्यापर्यंत अनेक लोकोपयोगी कायदे झालेच नसते. नर्मदा आंदोलनाने विस्थापितांसाठी लढा उभारला नसता तर पुनर्वसनाचा एकही प्रश्न सुटला नसता. लवासा, आदर्श हे सगळे प्रश्न चळवळी उभारल्याने मार्गी लागले, महाराष्ट्रात चार एसईझेड आत्ता आत्ताच सरकारला रद्द करावे लागले, सिंगूर, नंदीग्राम असो की भट्टा पर्सौला, सर्व ठिकाणी चळवळीच लोकांचा आधार झाल्या आहेत. रामलीला मैदानावर लोकांनी “आंदोलनाला”च प्रतिसाद दिला होता, राजकारणाला नाही! असे असतांना आता आंदोलनाने काही होणार नाही या निष्कर्षाला “टीम” कशी आली? तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि तुम्ही जरूर राजकारणात जा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, अरविंद केजरीवाल पंतप्रधान झालेले बघायला आम्हालाही आवडेल, मात्र त्यासाठी आंदोलनान्वरचा लोकांचा विश्वास उडेल अशी मांडणी करण्याचे कारण काय? किरण बेदी, मनिष सिसोदिया, कुमार विश्वास यांनी किती चळवळी आजपर्यंत केल्या की म्हणून त्यांनी घाईने असा निष्कर्ष काढला?  आणि मुद्दा असाही आहे की गेली ३५ वर्षे संघर्ष करून अण्णा थकलेले नाहीत याउलट केवळ १६ महिन्यातच जी टीम आंदोलनाला कंटाळली ती एका वर्षातच कशावरून राजकारणालाही कंटाळणार नाही? त्या दृष्टीने या आंदोलनाचे social suicide followed by political abortion असे रुपांतर झाले तर सगळेच संपेल, हा फार मोठा धोका समोर दिसतो आहे.

दुसरा मुद्दा असा की जर राजकीय पक्ष काढायची अनिवार्यता होतीच तर हा मुहूर्त त्याला योग्य होता का? दहा दिवसाच्या अयशस्वी उपोषणांनंतर अशी घोषणा करणे व्यवहार्य होते का? कदाचित रामलीला मैदानावर तेरा दिवसांचे उपोषण संपतांना अशी घोषणा झाली असती तर ते समजण्यासारखे होते. “आम्ही संसदे बाहेरची लढाई जिंकली असून आता संसदेच्या आत जाण्याची लढाई जिंकून दाखवू” अशी विजीगिषु भूमिका त्यावेळी शोभून दिसली असती. एखादा विद्यार्थी मेरीटने पास झाला त्या दिवशी त्याने “मी आता अमुक-तमुक परीक्षाही देणार आहे” अशी घोषणा करणे वेगळे आणि नापास झाल्याच्या दिवशी अशी घोषणा करणे वेगळे ! दुसऱ्या स्थितीत ती घोषणा न ठरता ‘फुकाची वल्गना’ ठरते याचे तरी भान सुविद्य आणि धोरणी अशा “टीम”ने बाळगायला हवे होते!    

तिसरा मुद्दा असा की राजकीय भूमिका घ्यावीच लागणार असेल तर त्यासाठी पक्ष काढण्याची गरज आहे का? आणि पक्ष काढण्यासाठी पैसा, दारू, गुंड कुठून आणायचे? देशभरात निवडक ठिकाणी (उदा. १००-१२५) चांगले अपक्ष उमेदवार उभे करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी मोहीम राबवणे शक्य नव्हते का? अशा प्रचाराला अण्णाही बाहेर पडले असते आणि आंदोलनातील कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले असते.

या राजकीय पक्षात न जाण्याचा माझ्यासह अनेकांचा निर्णय झालेला आहे. भविष्यातील राजकारणासाठी आम्ही “केजरीवाल आणि मंडळी” यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. राजकारणाची खुमखुमी भविष्यात आलीच तर आम्ही योग्य त्या प्रस्थापित पक्षात जाऊ कारण तिकडे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे !! आम्ही सर्व समविचारी कार्यकर्ते लवकरच राळेगण येथे जाऊन अण्णांची भेट घेऊ आणि भ्रष्टाचार विरोधी लढाई त्यांनी पुढेही चालू ठेवावी अशी विनंती करू. आम्ही राष्ट्रीय दर्जाचे नेते नसलो, सामान्य कार्यकर्ते असलो तरी दिल्लीकरांपेक्षा चांगल्या पद्धतीने आंदोलन पुढे नेऊ शकतो हा आमचा आत्मविश्वास आहे.         

कॉंग्रेसने टीम साठी दोन सापळे रचले होते. फक्त अण्णाच का उपोषण करतात? टीम का करत नाही? हा पहिला सापळा होता. या प्रश्नाचे सरळ उत्तर असे होते की उपोषण हा “वैयक्तिक” सत्त्याग्रह असतो, सामुहिक नव्हे. स्वातंत्र्यापूर्वी गांधीजी एकटेच उपोषणाला बसत, एका महिन्यात गांधीजी आणि दुसऱ्या महिन्यात नेहरू, पटेल उपोषण करतात असे कधीच दिसले नाही. दुसरा सापळा होता तो “तुम्ही राजकारणात येऊन दाखवा” हा! खरे म्हणजे गेल्या ६५ वर्षात देशाचे वाटोळे राजकारणातील बजबजपुरीमुळेच झाले आहे आणि म्हणून राजकीय पक्षातील चांगल्या लोकांनी आता समाजकारणात यावे असा प्रतिहल्ला चढविता आला असता मात्र दुर्दैवाने “टीम” दोन्ही सापळ्यांमध्ये अलगद फसली. शेवटी कॉंग्रेसमधील विकृत विचारांच्या लोकांनी दिलेले आव्हान कितपत मनावर घ्यायचे याचा विचार चळवळीचा गळा घोटण्यापुर्वी ‘महामहोपाध्याय’ मनिष सिसोदिया, कुमार विश्वास, किरण बेदी, संजय सिंग, गोपाल राय प्रभृतींनी करायला हवा होता, किमान अरविंद केजरीवाल असा विचार करू शकले असते. हा निर्णय घेतांना अण्णांचा नाईलाज झाला असे त्यांच्या ब्लॉग वरून आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून दिसतेच.      

 २. अण्णांनी “कोअर कमिटी” आणि “टीम” बरखास्त करणे

मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो ! या निर्णयाचे सर्व कार्यकर्तेही स्वागतच करतील. आता एकदा टीम राजकीय पक्ष काढणार म्हटल्यावर “टीम” कायम ठेवून त्यांच्या भविष्यातील बेजबाबदार वर्तनाची / वक्तव्यांची जबाबदारी अण्णांनी का घ्यावी? जे झाले ते योग्यच झाले, भ्रष्टाचार विरोधातील लढाईने आता “पुनश्च: हरिओम” करावे. आम्ही सर्वजण त्यासाठी सज्ज असू.   
प्रकृती बरी होताच सर्वच विषयाच्या अनुषंगाने माझी भूमिका विस्तृतपणे मांडणार आहे; तूर्तास कार्यकर्त्यांमध्ये माझ्या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम असू नये यासाठी हा लेखनप्रपंच.

***

Tuesday, July 31, 2012

हंगामा नही, परिवर्तन हमारा उद्देश्य है !


जंतरमंतर पर चल रहे जनलोकपाल आंदोलन के दुसरे चरण मे जो घटनाएं घट रही है उसे लेकर आंदोलन मे श्रद्धा रखनेवाले एवं आंदोलन के चाल, चरित्र और चेहरे के प्रती आस्था रखनेवाले  कार्यकर्ताओं मे दु:ख एवं निराशा की भावना है I  मिडिया एवं राजनैतिक लोगों के प्रति जो व्यवहार हो रहा है वह बहुत ही दुखद है I अत: इस आंदोलन के चाल, चरित्र और चेहरे को लेकर अब शायद स्वयम अन्नाजी को ही कुछ अहम फैसले करने होगे I “हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सुरत बदलनी चाहिये” इस विचार से शायद हमारा आंदोलन दूर जाते दिखाई दे रहा है जो निश्चित ही गहरी चिंता का विषय है I अगर हम आंदोलन का अच्छा भविष्य चाहते है तो इस आंदोलन की चाल, चरित्र और चेहरा मैला न हो इसपर गौर करना अनिवार्य है I

कल मुंबई में कुत्तो का पोस्टर लगाकर जो घीनौना प्रदर्शन जिस किसीने किया हो, उसकी कडी निंदा होनी चाहिये I इसका ध्यान रहे की मिडीया मे भी कई ऐसे लोग है जिन्हे अण्णा और आंदोलन के प्रती आस्था है I कई चॅनेल्स ऐसे है जिन्होने रामलीला मैदान वाले आंदोलन का प्रसारण बिना कोई कमर्शीयल ब्रेक लिये चोबिसो घंटे दिखाया था I अगर हम मिडीया से यह उम्मीद रखते है की हम बार बार आंदोलन करे और मिडीया हर समय उतनाही कवरेज दे, तो शायद हमारी उम्मीद हद से बढकर है जिसे पुरा नही किया जा सकता I आखिर हम ऐसा क्यों सोचे की मिडीया हमारा बंधक है और हम जब चाहे उससे हमे सहयोग मिलना चाहिये ? मिडीया की इस प्रकार की आलोचना से हम क्या हासिल कर सकते है ?

राजनेताओंके भ्रष्टाचार के बारेमे हमारी सख्त धारणाए है और हम भ्रष्ट राजनेताओं के खिलाफ है; लेकिन इसका मतलब यह नही की हम हिंसक आंदोलन का मार्ग अपनायें I हिंसा हमे हमेशा वर्जित हो, चाहे आंदोलन का जो भी परिणाम निकल आये I यह आंदोलन अगर हिंसा अपनाता है तो यह ना केवल आंदोलन की हार होगी बल्की समुचे गांधी विचारधारा एवं अण्णाजी के अबतक किये कार्य की हार होगी I इसको ध्यान में रखते हुये सभी कार्यकर्ता अपने आपको हिंसासे दूर रखें I नफरत नहीं, परिवर्तन हमारा उद्देश्य हो I       

इस विषय मे महाराष्ट्र के कई कार्यकर्ता मुझसे संपर्क कर अपनी नाराजगी जता रहे है I मै उन सभी साथीयोंको आश्वस्त करता हुं की कार्यकर्तांओंका एक दल इस स्थिती के मद्देनजर अण्णाजी से उनकी रालेगण वापसी पर वार्तालाप करेगा I हम आदरणीय अण्णा का साथ देते आये है, दे रहे है और भविष्य मे भी देंगे, इस पर किसी के मन मे कोई आशंका न हो किंतु अब यह अनिवार्य हो गया है की आंदोलन के चाल, चरित्र और चेहरे के बारे मे गंभीरतापूर्वक सोच एवं चिंतन हो I

जय हिंद !

Wednesday, March 28, 2012

याद राखा !!.....तुम्ही आम्हाला मान दिलाच पाहिजे ! अन्यथा ...

काल संसदेत टीम अण्णा विरुद्ध निंदाव्यंजक ठरावावर चर्चा होऊन संसदेचा सन्मान राखण्याची तंबी देण्यात आली! मुळात संसद सदस्यांवर “याद राखा! आम्हाला मान द्या” अशी तंबी देशातील नागरिकांना देण्याची वेळच का आली? पंडित नेहरूंच्या पासून अटल बिहारींच्या पर्यंतच्या काळात अशी वेळ का आली नव्हती आणि आता एवढी घसरण झाली आहे का की अशी वेळ येते, याचा विचार तरी व्हायला हवा.

अर्थात पहिल्यांदा हे स्पष्टच केले पाहिजे की मनिष सिसोदिया यांनी ज्या भाषेत शरद यादव यांच्यावर टिप्पणी केली ते अजिबात समर्थनीय नाही. शरद यादव हे देशातील मोजक्या प्रमाणिक, वैचारिक बांधिलकीला मानणारे आणि आयुष्यात १ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचाही ज्यांच्यावर कधी आरोपही झाला नाही अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. संसदेत ४० वर्षे त्यांनी भ्रष्टाचार विरोधात प्राणपणाने लढा दिला आहे. त्यामुळे सिसोदिया यांचे वक्तव्य एकतर त्यांच्या राजकीय अज्ञानातून किंवा अति-उत्साहामुळे आले असावे. डॉ.मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, ए बी वर्धन, गुरुदास दासगुप्ता, नितीश कुमार असे अनेक स्वच्छह राजकारणी देशात असतांना सर्वांनाच भ्रष्ट म्हणणे अजिबातच योग्य नाही याचे भान कार्यकर्त्यांनी पाळायलाच हवे, हा एक भाग झाला, मात्र संसदेची प्रतिष्ठा कोणामुळे खालावते हा प्रश्न तरीही शिल्लक राहतोच! काल संसदेत अभूतपूर्व एकी दाखविनार्या सर्व राजकीय पक्षांना आपण हे विचारायलाच हवे की संसदेची प्रतिष्ठा नेमकी वाढते कशामुळे? नोटांची बंडले सभागृहात दाखविल्यामुळे? पैसे देऊन खासदार विकत घेण्यामुळे? सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेतल्याने? वेल मध्ये उतरून गोंधळ घातल्याने? सभागृहात बील फाडून टाकल्याने? विधान भवनात अश्लील फिल्म पहिल्याने? देशासाठी महत्वाची चर्चा चालू असतांना सभागृहात अनुपस्थित राहिल्याने? वर्ष वर्ष मौनात राहिल्याने? एफडीआयच्या प्रश्नावर १२ दिवस संसद बंद पाडल्याने? सारख्या सारख्या सभात्यागाने की आणखी कशाने? आणि तरीही आम्ही बोलायचे नाही...ही संसदीय लोकशाही म्हणायची की संसदीय हुकुमशाही?

संसदेवर लोकांचा रोष नाही, तो काही संसद सदस्यांवर आहे. एखाद्या मंदिरातील काही पुजारी भ्रष्ट आहेत असे म्हटल्याने मंदिराचा किंवा देवाचा अपमान होत नसतो. टीम अन्नातील कोणीही संसदेचे महत्व नाकारलेले नाही. संसद सार्वभौम आहेच, तिला सार्वभौमत्व कोणी दिले? तर भारतीय राज्यघटनेने दिले आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली? तर We, the people of India ! अर्थात “आम्ही भारतीय लोक” ! आणि म्हणून संसद सार्वभौम आहे तर भारतीय जनता तिच्याइतकीच सार्वभौम आहे कारण ती जनताच संसदेला निवडून देते, तिचे सार्वभौमत्व प्रमाणित करते....अर्थात हे समजून घेण्याचे ठरविले तर नक्कीच समजून घेता येईल मात्र झोपेचे सोंग आणायचे ठरविले तर कोणी काहीच करू शकत नाही.

सर्वांचा टीम अन्नाला सल्ला एकच....तुम्ही निवडणुका लढवून सिस्टीमचा भाग बना आणि मग बोला अन्यथा बोलू नका! या सर्वांना हे विचारले पाहिजे की ही सिस्टीम म्हणजे नेमके कोण हो? आमच्याच मताच्या जोरावर निवडून येऊन आमच्यावरच सत्ता गाजविणारे तुम्ही + आमच्याच पगारावर पोसलेले नोकर एवढे दोनच घटक म्हणजे सिस्टीम का? की मत देणारे, कर भरणारे आम्ही देखील कोणीतरी आहोत तुमच्या सिस्टीम मध्ये? आम्ही नसू तर तुमची सिस्टीम कशाच्या जीवावर चालणार? की सिस्टीम मधील आमचा सहभाग केवळ ५ वर्षातून एकदा मत दिले की संपतो? आणि आम्ही कोणालाच मत दिले नाही तर कशी चालणार हो तुमची सिस्टीम? ज्याच्यामुळे ही सिस्टीम तयार झाली त्यालाच ‘तू कोण?’ असे विचारता? निवडणूक लढविली आणि सगळे मार्ग वापरून निवडून आले म्हणजेच सिस्टीमचा भाग होता येते का? अन्यथा नाही? मग महात्मा गांधींनी, लो.टिळक, स्वा.सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हेडगेवार यांना आणि करोडो सामान्य भारतीयांना तुमच्या सिस्टीमचा भाग मानणार की नाही? निवडणुकीचा एकच दिवस लोकशाहीचा नसतो...वर्षातले इतर ३६४ दिवस देखील लोकशाहीच असते हे लक्ष्यात ठेवा, अन्यथा आमच्याशी गाठ आहे असे आता जनतेनेच सांगितले पाहिजे म्हणजे हे “सिस्टीम” नावाचे घोडे बेलगाम वैचारिकतेने चौखूर उधळणार नाही. वेळ गेलेली नाही, अजूनही स्वतःला सुधारा! सामान्य माणसाला या सिस्टीमचा केंद्रबिंदू मानून काम करा...बाबासाहेबांच्या घटनेची तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे.

जेष्ठ लोक बोलतात की आम्ही संसदेचेच नाही तर घटनेचे अपराधी आहोत...साहेब, घटनेच्या ५० व्या कलमाच्या अंमलबाजावणीचा आग्रह धरणे म्हणजे घटनाद्रोह आहे का? की शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे घटनाद्रोह आहे? एकदा तुमच्या व्याख्या तरी कळू द्या आम्हाला...! आणि ज्यांनी बाबा रामदेव यांच्या आंदोलनात रात्री लोकांना झोपेत असतांना मारहाण केली, कुठलाही कायदेभंग केलेला नसतांना सकाळी अण्णांना अटक केली त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचे आहे की तुमच्या निष्पक्ष धोरणात असे म्हणणे बसत नाही? त्यांनी असे करणे घटनाद्रोही नाही काय? टीम अन्नाने काय करू नये ते सांगण्यापेक्षा काय करावे ते सांगा, त्याने देशाचे अधिक कल्याण होईल..

विद्वान-प्रतिष्ठितांनी लढाईच्या मार्गावर काटे पसरविण्यापेक्षा त्यांना हा मार्ग पसंत नसेल तर दुसरा त्यांच्या पसंतीचा मार्ग दाखवावा...जनता त्यांच्या मागे येईल... मात्र कुठलाच मार्ग न दाखविता जनतेला याच फसवणुकीच्या वाटेवर चालण्यात देशाचे, संसदेचे, घटनेचे कल्याण आहे असे सांगून भ्रमित करण्याचे उद्योग सोडून द्यावेत एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. विद्वत्तापूर्ण प्रतिपादनाने जगाला क्षणभर चकित जरूर करता येते, पण भ्रष्टाचाराने गांजलेल्या प्रजेला त्यातून दिलासा मात्र मिळू शकत नाही...असा दिलासा देण्याची एक शक्यता फक्त सध्या सुरु असलेल्या आंदोलनातच काहीशी दिसत आहे, हे त्यांनी समजून घ्यावे.

***

Sunday, January 1, 2012

वर्तमानपत्रांनी पत्रकारितेचा धर्म सोडू नये

काल सजग नागरिक मंच तर्फे आयोजित व्याख्यानात मी काही केलेली आणि काही न केलेली विधाने छापून आलेली आहेत. मी मुंबईतील आंदोलन फसले असे कधीही बोललो नाही, तरीही मी तशी कबुली दिली, ‘घरचा आहेर’ दिला वगैरे मथळे पाहून मी स्वतःच आश्चर्यचकित झालो. त्यामुळे कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी मी हा खुलासा मुद्दाम करीत आहे.

... सजग नागरिक मंचाने आयोजित केलेले कालचे व्याख्यान खुले होते आणि त्यात म...ुख्यत: श्रोत्यांमध्ये कार्यकर्ते जास्त संख्येने होते, इंडिया अगेन्स्ट करप्शन तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते आणि माझ्या व्याख्यानात काहीही आक्षेपार्ह आहे असे कुठल्याही कार्यकर्त्याला वाटले नाही, वर्तमानपत्रांना वाटले, हे विशेष.

आत्मपरीक्षणाच्या विषयी मी “आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल” असे शब्द वापरले यावरून “टीम अण्णाने” आत्म परीक्षण करावे असा सल्ला मी दिला हा निष्कर्ष एकांगी आहे. टीम अण्णाना सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही. माझा उल्लेख काही वर्तमान पत्रांकडून “कोअर कमिटी मेम्बर” असाही केला गेला, मी कधीही कोअर कमिटीचा सभासद नव्हतो आणि नाही.

हे व्याख्यान एकूण १ तास २० मिनिटे झाले आणि त्यातील १ तास १० मिनिटे मी चळवळीच्या यशाबद्दल, फलश्रुतीबद्दल बोललो. दुर्दैवाने काही वर्तमानपत्रांचा अपवाद वगळता कुणीही यातील एक ओळही छापली, मी या चळवळीची केलेली सकारात्मक समीक्षा (एकूण ८० मिनिटांच्या व्याख्यानातील ७० मिनिटे!) वर्तमानपत्रांना छापावी वाटू नये आणि शेवटची १० मिनिटे मी काही आत्मपरीक्षणपर बोललो ते मात्र मोठे मथळे देऊन छापून यावे हे अत्यंत एकांगी आणि चळवळीबद्दल आकस दाखविणारे आहे. वर्तमानपत्रांनी मुख्य आशय छापावा, व्याख्यानातील सर्व बाजू छापाव्यात ही अपेक्षा गैर नाही मात्र असे घडले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

चळवळीतील सहकाऱ्यांचा, चळवळीला पाठिंबा देणार्या लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी मुद्दाम सांगतो की अण्णांच्या चळवळीचा मी एक सामान्य सैनिक आहे आणि यापुढेही राहीन, या चळवळीशी प्रतारणा करण्याची कल्पनाही मला शिवू शकत नाही. चळवळीत उत्तरोत्तर सुधारणा व्हाव्यात याची तळमळ मी बाळगतो मात्र कुठल्याही परिस्थितीत या चळवळीपासून मी लांब जाणार नाही. आदरणीय अण्णांच्या बद्दल माझा आदर तसूभरही कमी झालेला नाही आणि अण्णांच्या सर्व निर्णयांची आदरपूर्वक अंमलबजावणी करणे हेच मी आद्य कर्तव्य समजतो. आदरणीय अण्णांनी आयुष्यभराच्या त्याग आणि तपश्चर्येतून जे अलौकिक यश मिळविले आहे त्याला आमच्या वागण्या-बोलण्याने कुठेही कमीपणा येईल असे वर्तन आमच्यातील कोणीही कार्यकर्ता कधीही करणार नाही अशी ग्वाही देऊन हा खुलासा संपवतो.

डॉ. विश्वंभर चौधरी